Friday, August 7, 2015

तुम्ही भलेही दिवसरात्र काम करण्याचा अट्टहास कराल परंतु रात्र झाली की थोडासा आराम हा करावाच लागतो. तुम्ही कितीही घुबडासारखा जागण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या नकळत झोप येणारच. आणि जर तसे नाही तर झाले तर इस्पितलाशी (हॉस्पिटलाशी) किंवा मानसतज्ञाची गाठ ठरलेली. इस्पितळात आराम करण्यापेक्षा जर सुट्टी आहेच तर ती उपभोगायला काय हरकत आहे? ती रविवारची हक्काची सुट्टी नाही का आपण…. तुम्हाला मुलांची काळजी आहे आणि त्यांना उत्तमोत्तम देण्याचा तुमचा प्रयत्न आहे हे सर्व काही मान्य. परंतु मुलांना काय हवे हे कधी तपासून पाहिले आहे का तुम्ही? क्वचितच किंवा निव्वळ योगायोग म्हणा पण जे तुम्हाला हवे आहे तेच त्यां मुलांनाही हवे असते कधीकधी. बहुतेकवेळा ते मनाविरुद्ध तुमचे म्हणणे ऐकतात किंवा तुम्ही दिलेल्या एखाद्या प्रलोभनामुळे. पण त्या ऐवजी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून बघा कदाचित परिणाम काहीतरी भन्नाट निघतील. पण जर का त्यांचे पक्के मत बनले की तुम्ही त्यांचा संभाव्य त्रास टाळण्यासाठी त्यांना दूर लोटता आहात, तर कदाचित ते कायमचे दुरावले जातील. त्यामुळे वेळ महत्वाची आहे असे पिपेरी वादन करता करता तुम्ही तुमच्या महत्वाच्या व्यक्तींनाच कायमचे मुकाल. मान्य आहे की लहान वयात मुलांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते. योग्य वेळेवर त्यांना शिकविणे गरजेचे असते वगैरे वगैरे अगदी मान्य. पण जे तुमच्यासाठी महत्वाचे आहे ते त्यांच्यासाठी महत्वाचे असेलच हे कशावरून? शिकवलेले वाया जात नाही पण जबरदस्ती शिकविले तर डोक्यातही जात नाही. त्यामुळे जी वेळ तुम्ही महत्वाची मानताय कदाचित ती त्यांच्यासाठी महत्वाची नसेल. शेवटी वेळ महत्वाची आहे हे कळण्याचीही वेळ यावी लागते. आणि मला खात्री आहे की तुमची ती वेळ आली आहे. #

Featured Post

https://youtu.be/dVCmtU8EJPs?feature=shared 'द कॉप अँड द अँथेम' (The Cop and the Anthem): एक सर्वसमावेशक माहिती दस्तऐवज ओ. हेन्री या...